Maharashtra Rain Alert महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा जोर पुन्हा वाढला असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील २५ जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या २४ तासांत अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. सोमवारी विदर्भात दमदार हजेरी लावल्यानंतर, आजही (८ जुलै) अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
Maharashtra Rain Alert
पुढील तीन दिवस कोकण, घाटमाथा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा प्रभाव जाणवेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
विभागनिहाय पावसाचा अंदाज: कुठे कोणता अलर्ट?
मुंबई आणि कोकण: मुंबईमध्ये आकाश ढगाळ राहील आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्र: धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात अतिवृष्टीचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी, नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. या सर्व जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट आहे.
पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. पुणे आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेषतः साताऱ्यातील घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अतिवृष्टी नुकसान भरपाई या शेतकऱ्यांची रद्द….Nuksan Bharpai
मराठवाडा: मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या सहा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे आणि पावसाचा जोर राहील. परभणी आणि नांदेडच्या काही भागांत तर मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे.
विदर्भ: मुसळधार पावसाचा कहर! विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार आहे. चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि वाशिम या आठ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अकोल्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याने, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. नद्या, नाले आणि घाट रस्त्यांवर विशेषतः सतर्क राहावे. तसेच, स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला:
- पाण्याचा निचरा: शेतात पाणी साचू नये यासाठी निचऱ्याच्या मार्गांची त्वरित सफाई करून ठेवा.
- भात लागवड: भात रोपे लावणी करताना पाणी कमी असलेल्या शेतांमध्ये पाणी साचल्यास रोपे कुजू शकतात, त्यामुळे योग्य पाण्याचा निचरा सुनिश्चित करा.
- उभी पिके: कापूस, सोयाबीन, तूर यांसारख्या उभ्या पिकांमधील अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी योग्य चर तयार करा.
- रोग नियंत्रण: पिकांवर बुरशीजन्य रोग येऊ नयेत म्हणून गरजेनुसार शिफारस केलेली औषधे फवारणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.